शिक्षणभरारी मध्ये आपले स्वागत आहे

इसापनितीच्या गोष्टी

                                                                 इसापनितीच्या गोष्टी
इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप व त्याच्या जगप्रसिध्द इसापनितीची एक ओळख ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप


                                                                    मन वळवणे श्रेष्ठ
 
                 उत्तरवारा व सूर्यनारायण यांची अधिक श्रेष्ठ व शक्तीमान कोण, याबद्दल एकदा खूप हमरी-तुमरी झाली. शेवटी ते सिध्द करण्याचा एक मार्ग त्यांनी निश्चित केला. रस्त्याने जाणा-या एका प्रवाशाला त्याच्या अंगावरील कपडे काढायला लावण्यात जो यशस्वी होईल तोच श्रेष्ठ व विजयी होय, असे दोघांनी ठरविले.
पवनराजाने प्रवाशावर पहिला हल्ला केला. सोसाटयाचा वारा सुटला. वा-याच्या त्या प्रचंड सोसाटयात सापडताच प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे आपल्या शरीराभोवती अधिक लपेटून घेतले. इतकेच नाही, तर वा-याने जेंव्हा अधिक उग्र स्वरूप धारण केले, तेंव्हा तर त्या माणसाने आणखी एक वस्त्र आपल्या अंगाभोवती लपेटून घेतले. अखेर कंटाळून जाऊन वा-याने आपण हरल्याचे कबूल केले, व त्या प्रवाशाला सूर्य नारायण कसे काय वागवतील, ह्या उत्सुकतेने वायुराज गंमत पाहू लागले...
सूर्य प्रथम उबदारपणे प्रकाशू लागला, तसा प्रवासी शांत झाला. त्याने बाहेरचे लपेटलेले वस्त्र बाजूस सारले. हळुहळू आपली प्रखरता वाढवीत सूर्य तेजाने तळपू लागला. अखेर उष्णता असह्य होत चालली, तसतशी आपल्या अंगावरील सारी वस्त्रे त्या प्रवाशाने एकामागून एक काढून टाकली. या नंतरही उष्णता आणखी असह्य झाल्यावर तो प्रवासी जवळच्या नदीत अंघोळ करावयास उतरला.
         तात्पर्य     बळजबरीपेक्षा कुशलपणे दुस-याचे मन वळविणे, हेच जगात अधिक यशकारक असते, हेच खरे. झोटींगांपेक्षा प्रेमदेवताच जगाचा अधिक लवकर विकास करू शकते.
                                                                     दुष्टांचा स्वभाव

                           एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.
पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.

             तात्पर्य - वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही
                                                                         मैत्रीच्या मर्यादा
              एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.'
एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!'
'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!'
                        तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.

                                                           आंधळा सूड

एका सापाच्या डोक्यावर एक गांधीलमाशी बसली व दंश करून ती त्याला सतावून सोडू लागली.
साप त्यामुळे अगदी वेडापिसा झाला. काय करावे व तिच्या तडाख्यातून कसे सुटावे, हे त्याला मुळीच कळेना. रागारागाने तो तिचा सूड उगवण्यासाठी मार्ग शोधू लागला.
तेवढयात तेथून एक बैलगाडी जाताना त्याला दिसली. सापाने आपल्या शत्रूला ठार करण्यासाठी तत्काळ त्या बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके ठेवले. त्या चाकाखाली ती गांधीलमाशी चिरडून मेलीच, पण तिच्याबरोबर त्या सापाचीही सपाटपोळी झाली.
               तात्पर्य - आपल्या शत्रूंना जिवंत ठेवण्यापेक्षा काही लोक त्यांच्याबरोबर स्वत:चाही मृत्यु झालेला पत्करतात. सूडाने आंधळी झालेली माणसे आत्मघात व समाजघातच करतात. सूडबुध्दीने जगाचे एकूण अकल्याणच जास्त होते
                                                           गर्वाचे घर खाली
 
                 कोंबडयांवरून जुंपलेल्या भांडणामध्ये एक कोंबडा खूप जखमी होऊन पराभूत झाला होता. बिचा-याने लाजेने चूर होऊन एका अडगळीमध्ये तोंड लपविले.
विजयी झालेला दुसरा कोंबडा एका उंच भिंतीवर दिमाखाने चढला व अगदी उच्च स्वरात त्याने आपण जिंकल्याच्या आनंदात त्याने एक ललकारी मारली.
त्याला पाहाताच, एका गरूडाने त्याच्यावर झेप टाकली व त्याला उचलून तो आकाशात उंच उडाला.
पराभूत झालेला कोंबडा तोंड लपवनू बसलेला असल्यामुळेच बचावला नि अखेर कोणी प्रतिस्पर्धी न उरल्यामुळे निश्चिंतपणाने त्या कोंबडयांमध्ये खेळूबागडू लागला.
                          कथासार - गर्वाचे घर नेहमी खालीच असते. घमेंडीत वावरणा-यांचा सदैव नाश होतो.

                                                     कोळी आणि चिमुकला मासा

           एक कोळी होता. रोज मासे पकडायचे, ते विकायचे, आणि जे पैसे येतील त्यावर उपजीविका करायची असा त्याचा जीवनक्रम होता. एक दिवस, दिवसभर प्रयत्न करूनही त्याला मासे सापडले नाहीत. शेवटी संध्याकाळी त्याच्या जाळयात लहानसा मासा सापडला.
तो मासा, कसेबसे श्वास घेत कोळयाला म्हणाला, 'बाबारे, मी तुझ्याकडे माझ्या प्राणांची भीक मागतो. मी इतका लहान आहे की, माझी बाजारात काहीही किंमत यायची नाही. कोणी मला खाल्ले तर त्याचे पोट देखील भरणार नाही. माझ्या शरीराची अजून वाढ व्हायची आहे. कृपा कर. मला पुन्हा पाण्यात सोडून दे. मी मोठा गरगरीत झाल्यावर माझा मेजवानीसाठी उपयोग होईल. त्यावेळी मला विकून तुला खूप पैसे मिळतील. आज तू मला सोडून दे.'
कोळी त्या माशाला म्हणाला, 'उद्याचे कोणी पाहिले आहे? शंकांनी घेरलेल्या उद्याच्या लाभासाठी आजच्या हातात गवसलेल्या लाभावर पाणी सोडणे अगदी मूर्खपणाचे कृत्य होईल. त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही.
               तात्पर्य - झाडातल्या दोन पाखरांच्या मागे लागून, हातातले एक गमावून बसण्यात अर्थ नाही.

No comments:

Post a Comment